फरहान
अख्तरचा ‘दिल चाहता है’ तसा म्हटला तर – stereotype - नेहमीचा वाटणारा हिंदी चित्रपट आहे, पण या
माध्यमातून तो काही नेहमीचे, काही इतर प्रश्न, काही नवीन प्रश्न वेगळ्या प्रकारे
मांडू पाहतो.
तिघे मित्र – आकाश,
सिद्धार्थ व समीर, वर्ग उच्च-उच्च मध्यमवर्ग (श्रीमंतच म्हणा ना) पण दोस्ती वर्ग,
स्थलातीत. एकदम पक्के दोस्त. तीन तरहांचे तिघे. आकाश उर्फ आमिर खान – परफेक्शन –
प्रेम-बिम झूट मानणारा- materialistic किंवा भौतिकवादी – प्रेम भावना वगैरे ‘झंझट’
असल्याने त्यात गुंतायचंच नाही अशी ठाम समजूत करुन घेतलेला.
समीर (सैफ अली खान) सर्वात बावळट, दिसल्या
मुलीवर भाळणारा (आणि फसणारा) दर दोन आठवड्यांनी भेटणारी नवीन मुलगी हेच आयुष्यातलं
साध्य (?) वगैरे मानणारा.
सिद्धार्थ (अक्षय खन्ना) चित्रकार आहे.
एकदम ‘आऊट औफ द वर्ल्ड’. ‘आध्यात्मिक’ असा शिक्का मी मारु शकत नाही, पण त्याच्यात
कलाकाराची संवेदनशीलता व निराळाच दृष्टीकोन पुरेपूर भरला आहे.
तिघे प्रेमाचा अर्थ लावू पाहतात आणि या
प्रकारात प्रेमाच्या निरनिराळ्या छटा व्यक्त होतात. या सगळ्यात नेहमीच
ह्रदयापरिवर्तन, मैत्री दुभंगणं, पुन्हा सांधणं, जुळलेलं लग्न मोडणं, भावनाशील
प्रसंग आदी सगळं आहे, पण तरीही मझा आहे.
संयत अभिनय, दिग्दर्शकाची अधूनमधून दिसणारी
चमक, चित्रपटाला न्याय देणारी गाणी व संगीत या आणखी काही जमेच्या बाजू.
वाचण्यासारखं फक्त इतकंच. यातलं सगळं किंवा
काही दिसेलच याची निश्चिती देत नाही, त्याकरता स्वत:च एकदा पहा.
(०५/१०/२००३)